शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास वणीतील हजारो शेतकरी जेलभरो आंदोलन करणार

October 31, 2025

वणी :  शेतकरी शेतमजूर आणि कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये विविध शेतकरी संघटना सहभागी होऊन नागपूरच्या रस्त्यावरती शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वणी तालुक्यातील समस्त शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत थेट मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.       महाराष्ट्रामध्ये सध्या सत्तेत असलेल्या सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मते घेतली मात्र सत्तेत येऊनही अजून पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सौजन्य फडणवीस सरकारने दाखवलेले नाही. त्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला आहे. फडणवीस सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांना या कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे हि दुर्दैवी बाब आहे,असेही निवेदनात म्हटले आहे.  महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्णतः उध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याऐवजी फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम तुटपुंजी मदत देऊन केलेले आहे. शेतकऱ्यांनी लागवडीकरिता लावलेला खर्च सुद्धा निघणार नाही,अशी मदत देऊन शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे.    शेतकऱ्यांचं सोयाबीन घरी आलेलं आहे, कापूस ही घरी येत आहे मात्र अजून पर्यंत सरकारी खरेदी केंद्र सुरू झाले नाही, त्याच सोबत शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाबद्दल अजूनही निश्चित घोषणा नाही. शेतकऱ्यांना शेतमाल तोट्यामध्ये विकावा लागतो हि सारी परिस्थिती या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सरकारने शेतकऱ्यावर आणून ठेवलेली आहे. या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी धुळीस मिटवलेले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा याप्रमाणे भाव देण्यासाठी महाराष्ट्राचा आणि देशाचं सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे, त्याचा परिणामस्वरूप शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर दिवसाला वाढते आहे. या वाढत्या आत्महत्येला या देशाचा आणि महाराष्ट्राचा सरकार जबाबदार आहे, त्यामुळे सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही एक नैतिक अधिकार नाही. सातबारा कोरा आणि शेतमालाला भाव द्या अन्यथा खुर्च्या खाली करा असा गर्भित इशारा आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे.      शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या,हमी भावाचा कायदा करा, शेतकऱ्यांचे संपूर्ण सरसकट कर्ज माफ करा, शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, खरीप हंगामा करिता विनाअट कर्ज उपलब्ध करून द्या,  या प्रमुख मागण्या व इतरही मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.     नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनातील संपूर्ण मागण्या मान्य कराव्या अन्यथा नेतृत्वाने आव्हान केल्याप्रमाणे सबंध महाराष्ट्रामध्ये जेलभरो आंदोलन केल्या जातील आणि त्यात वणी तालुक्यातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने जेल भरो आंदोलन करतील,याकडे सरकार म्हणून दुर्लक्ष करू नये. असेही निवेदनातून सरकारला कळविले आहे.     निवेदन देताना  मधुकर लांडे, किसान सभेचे कॉ.मनोज काळे, कॉ. ॲड. दिलीप परचाके, कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, अजय धोबे, लक्ष्मण देठे, गजानन राजुरकर, कुंदन टोंगे, गीत घोष, पुंडलिक पिंपळशेंडे, संजय गोहोकर, किसन राजुरकर, सतीश भटगरे, सेनापती पावडे, , त्याच प्रमाणे वणी वकील संघाने ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विरेंद्र महाजन, सचिव ॲड. अमोल टांगे, ॲड. शेखर वऱ्हाटे, ॲड.  विप्लव तेलतुंबडे, ॲड.  अमन शेख आदी उपस्थित होते.