धान् त्वरित वितरण करा : तहसीलदारांना निवेदन
टोलेबाज न्युज वार्ता :रवि घुमे
मारेगाव :आयुष्यमान कार्ड ही केंद्र शासनाची योजना आरोग्याशी संबंधीत असतांना धान्य मिळविण्यासाठी राशन कार्ड आहे. आयुष्यमान कार्ड आणि धान्य वितरणाचा काडीमात्र संबंध नसतांना काही तांत्रिक कारणास्तव आयुष्यमान कार्ड काढण्यास विलंब झालेल्या गरीब लाभार्थ्यांचा शासकीय अन्नधान्य पुरवठा रोखून धरण्याचा बेकायदेशीर प्रकार मारेगावात घडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने लाभार्थी पुरता मेटाकुटीस आला आहे.याबाबतचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले आहे.
आयुष्यमान कार्ड साठी रोखलेले धान्य लाभार्थ्यांना त्वरित मिळावे या करीता आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांनी मारेगाव तालुक्याचे तहसीलदार निलावाड यांना निवेदन दिले.
अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. यापैकी अन्न ही अत्यंत निकडीची गरज. आर्थिक दृष्टया दिन दुबळ्या कुटुंबातील आबालवृद्ध संपुर्ण घटकांना दोन वेळेचे पोटभर भोजन मिळावे एवढीच गोरगरीबांची ही योजना येथे फोल ठरत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असून लाभार्थ्यांच्या वेदना केव्हा कळणार ? असा सवाल तिरानिक यांनी निवेदनातून केला आहे.ही योजना तात्काळ मार्गी लावून लाभार्थ्यांना धान्य वितरीत करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
जप्त केलीली रेती घरकुल धारकांना मोफत द्या : केशव तिराणिक
शासनाच्या धोरणात्मक कार्यक्रमानुसार घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास निःशुल्क रेती उपलब्ध करून मिळण्याचा अध्यादेश निघाला मात्र अधिकृत रेती घाटांचा व तारीख नसलेल्या परवाना पावत्या लाभार्थ्यांच्या माथी मारुन संबंधित यंत्रणेकडून हात झटकण्यात आले.अजूनही रेती अभावी अनेकांचे बांधकामं रखडलेली आहेत. मात्र मारेगाव तालुकांतर्गत ग्रामीण क्षेत्रात रेती तस्करीतून रेतीच्या साठेबाजीला उत आलेला आहे तेव्हा अवैध रेती साठेबाजांवर फौजदारी कारवाई करून जप्त केलेली रेती गरजु घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामास देण्यात यावी अशा आशयाच्या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांनी मारेगाव तालुक्याचे तहसीलदार निलावाड यांना दिले.यावेळी विजय तोडकर,सूर्यवंशी,पीडित लाभार्थी हर्षल चांदेकर,दर्शना चांदेकर आदींची उपस्थिती होती.
ही योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्हास्तरावरून तांत्रिक अडचण आहे. प्रशासनाच्या सातत्य पूर्ण प्रयत्नात आयुष्यमान कार्ड योजनेचा तात्काळ अंमल होईल असा आशावाद टोलेबाजचा प्रतिनिधिंशी बोलतांना तहसीलदार उत्तम निलावाड यांनी व्यक्त केला.













