जय जय रामकृष्ण हरी,नगाजी महाराजांच्या जय घोषाने दुमदूमली मारेगाव नगरी


“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।।”

ही संत सेना महाराजांनी लिहिलेल्या अभंगातील ओळ.
या ओळींचा अर्थ आहे की पंढरपूरला जाताना जीवांना खूप आनंद होतो आणि विठ्ठल (केशव) यांना भेटल्याने त्यांना खूप सुख मिळते. पंढरपूरची महानता आणि तिथे मिळणारे सुख व्यक्त करतात.

हो! अगदी योग्यच लिहिलं महाराजांनी,
पण पंढरीचं सुख हे नगाजी महाराजांच्या चरणाशीच तर नाही ना ह्या ध्येय्याने झपाटलेला एक जगन्नाथ नगरी वेगाव येथे वास्तव्यास असलेला तरुण तेजस मांडवकर सलून व्यावसायिक गत दोन वर्षांपासून नगाजी महाराजांना शरण गेला आणि गत वर्षी पासून इंदिरा एकादशीला मारेगाव येथील नगाजी महाराज देवस्थान च्या नियोजित जागेवर श्रद्धापूर्वक तन मन धनाने कार्यक्रम घेतो आहे.
नाभिक बांधव एकत्र करून वैयक्तिक तो भजन पूजा आरती करून अन्नदान करतो. कार्यक्रमासाठी मोठया संखेने नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
आणि हनुमान मंदिर येथे आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली.

न भूतो अशा पारंपरिक वारकरी हरिपाठ दिंडीने वेधले शहर वाशियांचे लक्ष
पारंपरिक वारकरी संप्रदायाची दिंडी धोतर टोपी खांद्यावर शेला आणि टाळ सोबत मृदंगाचा कर्णमधुर नाद हे दिंडीचे वैशिट्य लक्षनीय होते. रस्त्यावरून ये -जा करणारे क्षणभर थबकुन आपसूकच स्वतःच्या भ्रमनध्ववनीत चित्रीकरण करतांना दिसत होते.
ना ध्वनी प्रदूषण ना वाहतुकीला खोळंबा असा अद्वितीय सोहळा संत नगाजी भक्तांनी आगळ्या वेगळ्या स्वरूपात संपन्न केला.

गहाळ झालेली मोबाईल पोलिसांना गवसले

वणी : पोलीस स्टेशन वणी येथे विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल विविध ठिकाणावरून गहाळ झाल्याबाबत सविस्तर तक्रार दिली होती.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वणी येथील सायबर विभागामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार छाया उंमरे यांनी CEIR पोर्टल वरून तांत्रिक दृष्टिकोनातून उत्कृष्ट तपास करून एकूण 13 मोबाईल शोधून काढले असून सदरचे हरवलेले मोबाईल हस्तगत करून आज दिनांक 18/09/2025 रोजी मोबाईल धारक मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

सदरची कार्यवाही मा. ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात LPC 493 छाया उंमरे यांनी केली आहे.

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 127 प्रकरणाचा निपटारा, 1,60,26,079/- रुपरांची वसुली

वणी : मा. दिवाणी न्यायालय,व.स्तर, वणी येथे राष्ट्रीय लोक अदालतचे दिनांक 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पॅनल नं.1 पॅनल प्रमुख श्री.पि.एस. जोंधळे साहेब, दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठ स्तर, वणी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, वणी, पॅनल नं.2. श्री. शहाजी दत्तराव भोसले साहेब, सह दिवाणी न्यायाधिश व न्यायदंडाधिकारी, (प्र.श्रे.) वणी, पॅनल नं. 3 मध्ये श्री.ए.बी. बिरादर साहेब, 2 रे सह दिवाणी न्यायाधिश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्र.श्रे.वणी, तसेच पॅनल मेमेंबर श्री.धनंजय आसुटकर अॅडव्होकेट, आणि पॅनल मेंबर कु.शिरीन एम. पठाण, अॅडव्होकेट वणी उपस्थित होते.

सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये बॅंक व पत संस्थेची दाखल पुर्व एकुण 60 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन बॅंकेस रक्कम रु. 85 लाख 25 हजार 522 पाचशे बाविस रुपये वसुल करण्यात आले. मनी रिकव्हरी चे 03 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन 7 लाख 60 हजार रुपये वसुल करण्यात आले.
तर चेक बाउन्स चे 13 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला यामध्ये 67 लाख 20, हजार 757 रुपये ची रक्कम वसुल करण्यात आली. त्यातील चेक बाउन्सची 02 प्रकरणे 05 वर्षा वरील होती. किरकोळ गुन्ह्यांचे एकुण 51 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला यामध्ये 19 हजार 800 रुपयेची वसुली करण्यात आली. अश्या प्रकारे एकुण 127 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन एकूण रक्कम 1 एक करोड 60 साठ लाख 26 सव्वीस हजार 79 एकोणअंशी रुपयाची वसुली करण्यात आली.

सदर लोक अदालती मध्ये बहुसंख्येने पक्षकार, वकील, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच न्यायालयीन न्यायाधीश तसेच कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय लोक अदालतचे यशस्वीते करिता अथक परिश्रम घेवून सदर कार्यक्रम यशस्वी केले.

न. प. मारेगाव द्वारा स्वच्छता ही सेवा अभियानास प्रारंभ.

मारेगाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या पर्वावर २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली.या अभियानाचे उद्दिष्ट असे की,शहरापासून ते गावखेडया पर्यंत स्वच्छते बद्धल जागरूकता निर्माण करणे, यामध्ये उघड्यावर शौचास नं जाणे, स्वतःची शारीरिक स्वछता,घनकचरा निर्मूलन, घरातील कचराअसताव्यस्त नं फेकता तो साठवून कचरा गाडीत टाकणे, ज्यामुळे परिसर स्वच्छ राहील जेणेकरून आरोग्यविषयक तक्रारी दूर होऊन निरोगी आयुष्य जगता येइल.स्वच्छ भारत अभियान हे देशव्यापी अभियान असून त्याचाच एक भाग म्हणून दीर्घ काळानंतर मारेगाव ला स्थायी स्वरूपात लाभलेले कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्याबाबत शासनाचे निर्देशानुसार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या अभियानाचा प्रारंभ नगरपंचायत सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमात मुख्याधिकारी यांनी स्वच्छता ही सेवा पंधरवाड्याचे नियोजन व त्या अंतर्गत नियोजित विविध उपक्रमांची माहिती सांगितली. ह्या पंधरवाड्यात आरोग्य शिबीर, स्वच्छता रॅली, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम नगरपंचायतद्वारे घेण्यात येणार आहेत.

दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता एक दिवस, एक तास, एक साथ ह्या घोषवाक्यासह सामूहिक स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. कार्यक्रमात सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की होते. उपाध्यक्षा हर्षा महाकुलकर, मारेगाव तहसीलचे नायब तहसीलदार महेश रामगुंडे, मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. तसेच नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर (मशप्रसे), नगरसेवक हेमंत नरांजे नगरसेविका अंजुम शेख, नगरसेविका छाया किनाके यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर निरीक्षक राधिका देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन आस्थापना प्रमुख कविता किनाके यांनी केले.

कुमार चिंता पोलीस अधीक्षक यांचे जनतेला आवाहन

वणी : सनासूदीच्या आणि धार्मिक उत्सवात खरी कसोटी असते ते पोलीस बांधवांचीच. बंदोबस्तासाठी त्यांना मुख्यालय सोडून कुठच्या कुठे सेवा देण्यास जावे लागते.

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात पोलिस बंधुनी चोख बंदोबस्त ठेवला व नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याने कुठल्याही अनुचित प्रकाराची नामुष्की ओढावली नाही.

गणेश उत्सवाप्रमाणे दुर्गा उत्सव शांततेत व आनंदाने साजरा करण्यासाठी, सर्वांनी आपापसात सलोखा राखून, सामाजिक सौहार्द जपत, एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करून, तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्याने उत्सव साजरा करावा. असें आवाहन कुमार चिंता, यवतमाळ पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.

उत्सव साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच यावेळी आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असें देखील आपल्या संदेशात त्यांनी सांगितले आहे.

देशी दारू दुकानाच्या विरोधात कायर येथील महिला आक्रमक

वणी : तालुक्यातील कायर येथे ग्रामपंचायतीचा ना-हरकत घेता देशी दारूदुकान विनापरवानगी जागा बदलून थेट दुकान दुसऱ्या वार्डात थाटल्याने, या विरोधात गावातील संतापलेल्या नागरिकांनी आज बुधवारी दिनांक 17 रोजी या दुकानावर भव्य मोर्चा काढून दारू विक्री बंद करण्याची जोरदार घोषणाबाजी करत मागणी केली.

कायर येथील बाबापूर रस्त्यावरील दारुच्या दुकानाचे काही दिवसांआधी मुकुटबन रोडवर स्थानांतर झाले आहे. याबाबत ग्रामपंचायतीची ना हरकत न घेता दुकान सुरू करण्यात आल्याचा आरोप गावाकऱ्यांनी केला आहे. या विरोधात गावाकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले. परंतु, गावकऱ्यांच्या निवेदनाला प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

आज बुधवारी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला असून दारू विक्री सुरूच असल्याने या विरोधात येथील महिला आक्रमक होत थेट दुकान बंद करण्याची मागणी केली.

विजेचा लपंडावाने कुंभा परीसरातील नागरिक त्रस्त.

रवि घुमे : मारेगाव.
विद्युत वितरण विभाग मारेगाव च्या तालुक्यातील कुंभा परिसरात सतत खंडित वीज पुरवठा सुरु असून या खंडित विजपूरवठ्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून ग्रामस्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवा अशी मागणी सरपंच अरविंद ठाकरे यांनी विद्युत वितरण विभागासह तहसीलदारांना निवेदनातून केली.
संदर्भात आधीही अनेक वेळा संबंधित कार्यालयाकडे तक्रारी व निवेदनं दिली असूनही परिस्थितीत काहीही सुधारणा होतांना दिसली नाही.
यामुळे शेतीसहीत दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होत असून शेतकऱ्याचे विजेवर चालणारी उपकरणे
निकामी झाली आहे.
यांसारख्या समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्या लक्ष्यात घेऊन कुंभाचे जागरूक सरपंच अरविंद ठाकरे आपल्या समर्थकासह आक्रमक भूमिकेत वीज वितरण कंपनीत अधिकाऱ्यांना या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी धारेवर धरले.

कुंभा सर्कलसाठी कायमस्वरूपी लाइनमन व हेल्पर ची मागणी
निवेदनातून केली आहे कारण या भागात वारंवार वीज खंडित
झाल्याने अधिकारी वर्गाला संपर्क करणे कठीण झाले, त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येणे,सततच्या खंडित विजपूर्वठ्याने शेतकऱ्यांसहीत वीध्यार्थी, व्यवसायिक अडचणीत आल्याचा आरोप अरविंद ठाकरे यांनी निवेदनात नमूद केला आहे.
पावसाळ्यात आपत्कालीन सेवा सुरू करण्याची मागणी ही निवेदनातून केली आहे
वादळी वारा पाऊस या वेळेत विजे संबंधित निर्माण झालेल्या समस्या वर तातडीने उपाययोजना व दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी निवेदनातून केली

कुंभा या भागात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. काही वेळा वीज १२ ते २४ तास खंडित असते. अचानक जाते व अनेक वेळा रात्रीच्या वेळीही वीज बंद होते. यामुळे परिसरातील नागरिकांना, विद्यार्थी वर्गाला, तसेच व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात या आधीही गावकऱ्यांनी याबाबत संबंधितांना तक्रार नोंदवली आहे, परंतु अद्याप कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. तसेच त्यामुळे ११ के. व्ही. व ३३ के. व्ही. सबस्टेशन सुरु करण्यात यावे अशीही मागणी केली आहे. कुंभा येथील रहिवाशासह सरपंच अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता पांढरकवडा कार्यालय व म.रा.वि.वि.मारेगाव आणि तहसील कार्यालयावर आपल्या ताफ्यासह जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले.
Box
हप्त्याभरात विजे संबंधित समस्या निकाली काढण्याचा अल्टिमेटम यावेळी देण्यात आला.
मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच अरविंद ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
निवेदनाची दखल न घेतल्यास इथून पुढे पूर्ण गावात कोणीही वीज बिल भरना करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येईल असेही सरपंच सरपंच अरविंद ठाकरे यांनी
सांगितले.

उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी

वणी : अतीवृष्टीमुळे वणी उपविभागातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. ऑगस्ट महिन्यात झरी व वणी तालुक्यात तर या महिन्यात वणी व मारेगाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज तहसिल कार्यालयात धडक दिली. मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. हे निवेदन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेवणी विधानसभा क्षेत्रात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार व संततधार पावसामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे नांदेपेरा, शेलू, रांगणा, भुरकी, गोवारी, कोलेरा, पिंपळगाव, जुनी उकणी, निलजई, बेलोरा इत्यादी गावांतील पीक पूर्णतः पाण्याखाली गेले. तर गेल्या महिन्यात अतीवृष्टीमुळे पैनगंगा नदीला पूर आला होता. यामुळे झरी व वणी तालुक्यातील पैनगंगे काठच्या शेतशिवारातील शेती पाण्याखाली आली. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. सलग दोन महिन्यांतील या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतक-यांना एकरी 50 हजारांचे अनुदान द्यावे, यासह सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा. सीसीआय कापूस नोंदणीची मुदत वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जर ओला दुष्काळ जाहीर न केल्यास काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

अन्यथा शेतक-यांना घेऊन रस्त्यावर उतरू

सततच्या अतीवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे कठिण झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला असताना शासन अजूनही मौन बाळगून बसले आहे. त्यामुळे वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. अन्यथा आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन छेडू. — संजय रामचंद्र खाडे, प्रदेश सचिव, काँग्रेस

निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, तेजराज बोढे, डॉ. शंकर व-हाटे, उत्तम गेडाम, विकेश पानघटे, प्रमोद लोणारे, देवराव देऊळकर, दिनेश पाहूनकर, उषा नरेंद्र काटोके, विनित तोडकर, पुंडलीक गुंजेकर, संदीप कांबळे, प्रफुल्ल वाळके, नरेंद्र चिकटे, महादेव तुराणकर, सुधीर खंडारकर, संजय शेंडे यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बारमध्ये महिलांचा तांडव…. बारमालकासह मॅनेजरचा डोळ्यात मिरची पावडर फेकून मारहाण.

प्राप्त माहिती नुसार मनोज रामराव उरकुडे (४१) हे शिवाजी चौक वणी येथील रहिवासी असून यांचे वरोरा रोडवर न्यू ज्योती रेस्टॉरन्ट व बार आहे. शनिवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे बारमध्ये गेले. दुपारी १. ३० वाजताच्या सुमारास ८ ते १० महिला दोन ऑटोमधुन बार समोर आल्या. हाती प्लास्टीक पाईप व लाकडी दांडा घेऊन ही महिलांची टोळी अचानक बारमध्ये शिरली. काही महिला बार काउंटरवर तर काही महिला वरच्या माळ्यावर असलेल्या बार मालकाकडे गेल्या. त्यांनी बार मालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली व त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर काउंटरजवळील महिलांनी मॅनेजर आशिष खाडे याला शिविगाळ करीत मारहाण केली.

वंचितचा लढाच जुलूमी व्यवस्थेला हानून पाडेल. राजू निमसटकर.

समाज संघटित करण्याबरोबरच वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी मारेगांव तालुक्यातील सर्वहारा शोषित, आदिवासी, वंचित, बहुजन समाजातील जाणत्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून दिनांक १० सप्टेंबर रोज बुधवार ला मारेगांव येथील बदकी भवन सभागृहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात आयोजित मेळाव्याला लाभलेली जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसह नव्या दमाच्या उत्साही कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती वंचित बहुजन आघाडीला अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उत्साह निर्माण करणारी होती.

वंचित बहुजन आघाडी ही वंचित, शोषित,पीडित,शेतकरी,कष्टकरी, सर्वहारा शोषित बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी राजकीय संघटना असून जुलमी मनुवादी राजकीय व्यवस्थेविरुद्ध संघटितपणे लढायचे असेल तर आता श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय अर्थातच वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही. असे परखड मत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यामध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राजु निमसटकर यांनी व्यक्त केले.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सर्वहारा-शोषित-वंचितांच्या न्यायाची लढाई लढणारा एकमेव लढवय्या म्हणून, उभा समाज प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघतो आहे. परमपूज्य बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी केवळ वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव राजकीय पर्याय आणी सत्य आता सर्वांसमोर आहे. म्हणूनच वंचित बहुजन आघाडी हा सत्तेच्या राजकारणात बलशाली राजकीय पक्ष व्हावा, ही आपल्या सर्वांची गरज आहे, नव्हे तर ती आपल्या सर्वांची जबाबदारी देखील आहे. हीच सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित व्यवस्थेवर घनाघात करणारी असेल. यासाठी संघटितपणे लढण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, असे आवाहन राजू निमसटकर यांनी उपस्थित जनतेस केले.

आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या पदाधिकाऱ्यांसह अमरनाथ तेलतुंबडे, तात्याजी पाटील चिकाटे, अजाबराव गजभिये, यशवंतराव भरणे, गौतम तकसांडे या जुन्या जाणत्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मेळाव्याला विशेष उपस्थिती होती. विशेषतः ग्रामीण भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते व खास करून महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती वंचित बहुजन आघाडीच्या पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला ऊर्जा देवून गेली. विशेष म्हणजे याच कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सर्वांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडी मारेगांव तालुका ग्रामीण व मारेगांव शहर पुरुष व महिला कार्यकारिणीचे निर्माण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.अविनाश घरडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देखील सन्मानित करण्यात आले. येत्या काही दिवसातच नवनियुक्त कार्यकारीणीला अधिक मोठे रूप दिल्या जाईल व त्यांचा पदाधिकारी पदग्रहण सोहळयांसह पक्षप्रवेश सोहळा देखील आयोजित करू असा विश्वास उपस्थित सर्वांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य गौतमजी मालखेडे यांनी केले. तर वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त मारेगांव तालुकाध्यक्ष ग्रामीण ज्ञानेश्वर मुन यांनी कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे वासू वनकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.